Breaking News | Ahilyanagar: ४० हून अधिक गावांतील ५ हजार रामभक्त सोहळ्यात एकत्र आले होते.
भेंडा : नजीक चिंचोली (ता. नेवासा) येथे शनिवारी (दि. ३) वैष्णव सेवा आश्रम (बऱ्हाणपूर) यांच्या वतीने आयोजित फिरता हनुमान चालीसा सोहळा २०२६ अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. सोहळ्यात ४० हून अधिक गावांतील ५ हजार रामभक्त एकत्र आले होते. हा आकडा १०० गावांवर नेण्याचा संकल्प भाविकांनी केला.
गुरुवर्य भारतानंदगिरी महाराजांनी भाविकांना मार्गदर्शन करताना हिंदू धर्माचे महत्त्व पटवून देत, सध्याच्या काळातील व्यावसायिक कीर्तनकारांवर कडाडून टीका केली. महाराज म्हणाले, की जुने संत आपला व्यवसाय सांभाळून धर्म प्रसाराचे काम निःशुल्क करायचे. त्यांनी कीर्तनाला कधीच व्यापाराचे साधन बनवले नाही, पण आज धर्माच्या नावाखाली अनेक जण कीर्तन-भजनाचा व्यवसाय करीत आहेत, हे थांबले पाहिजे. तरुणाईला व्यसनमुक्ती आणि मांसाहार वर्ज्य करण्याचा मोलाचा सल्ला दिला. हनुमान चालीसा केवळ पठण न करता ती आचरणात आणल्यास तरुणांचे जीवन सुसह्य होईल, असा उपदेश केला.
सोहळ्याला देवगड संस्थानचे स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, खडेश्वरी देवस्थानचे गणेशानंद गिरी महाराज, ज्ञानेश्वर देवस्थान मंदिराचे महंत देविदास महाराज म्हस्के, लखमापूरचे दादा महाराज वायसळ, पैठणचे शिवानंद शास्त्री व दीपक महाराज उगले, बालमटाकळी येथील साध्वी शीतल देशमुख, हंडीनिमगावचे रमेशानंद गिरी महाराज, नीलेश महाराज वाणी आदी उपस्थित होती. सोहळ्यात बन्हाणपूर, आव्हाणे खुर्द, अमरापूर, काळेगाव, साकेगाव, हनुमान टाकळी, लखमापूर, तेलकुडगाव, देडगाव, लांडेवस्ती शेवगाव, सामनगाव, हनुमानवाडी, मळेगाव, देवगाव, पिंपरी शहाली, कुकाणा, भेंडा, शिरसगाव, पाथरवाला, गोपाळपूर, दहिगावने, तामसवाडी, हनुमाननगर, गेवराई आदी गावातील भाविक सहभागी झाले होते. भाविकांसाठी नजीक चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते.
Breaking News: Hanuman Chalisa ceremony with 5 thousand devotees














