Ahilyanagar: (Reading Books) माणसाने त्याही पुढे जाऊन पुस्तक, निसर्ग आणि माणूस यांना वाचण्याचे काम आयुष्यभर केले पाहिजे. पुस्तकांच्या वाचनाने माणूस नम्र होतो आणि समृद्ध होतो, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन साहित्यिक आणि संमेलनाध्यक्ष मनोज बोरगावकर यांनी केले.
पारनेर : वन्यप्राणी केवळ निसर्ग वाचत असतात, पण माणसाने त्याही पुढे जाऊन पुस्तक, निसर्ग आणि माणूस यांना वाचण्याचे काम आयुष्यभर केले पाहिजे. पुस्तकांच्या वाचनाने माणूस नम्र होतो आणि समृद्ध होतो, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन साहित्यिक आणि संमेलनाध्यक्ष मनोज बोरगावकर यांनी केले.
पारनेर येथील न्यू आर्टस, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात ‘पत्रकार दिना’चे औचित्य साधून पारनेर तालुका पत्रकार संघ आणि महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या विद्यमाने आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहसचिव मुकेश मुळे हे होते. या वेळी पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मार्तंडराव बुचुडे, विद्यमान अध्यक्ष उदय शेरकर, पत्रकार बबनराव गायके, शरद झावरे, विनोद गोळे, विजय वाघमारे, भास्कर कवाद, शशिकांत भालेकर, सनी सोनावळे, संतोष सोबले, सुरेंद्र शिंदे, अमोल खिलारी, शरद रसाळ, श्रीकांत ठुबे, सुदेश आबूज, विशाल फटांगडे यांसह महाविद्यालयाचे अध्यापक उपस्थित होते.
या वेळी बोरगावकर म्हणाले की, ‘पत्रकार हा देशाच्या संविधानाचे रक्षण करणारा महत्त्वाचा घटक आहे. जात, धर्म, वंश आणि भाषा या सर्वांच्या पलीकडे जाऊन ‘देश’ असतो. धर्म हा माणसांमध्ये अंतर पडण्यासाठी नसून तो माणसाला एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी असतो. ते पुढे म्हणाले, ‘स्त्रियांच्या पदराला हात घालणे हा पुरुषार्थ नसून, त्या पदराआड असलेले दुःख समजून घेणे म्हणजे खरा पुरुषार्थ होय.’ श्री. मुळे यांनी सांगितले की, साहित्यातून सर्जनशिलतेची प्रेरणा मिळत असते. ‘भारताला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला असून, हा वारसा पुढील पिढीने जपला पाहिजे. युवा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्जनशील साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळेल. संजय वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. उदय शेरकर यांनी युवा साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी सांगितली.
या वेळी पत्रकारितेत आणि समाजकार्यात उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार शशिकांत भालेकर यांना ‘निर्भीड पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर ‘स्व. बळवंतराव वाघमारे उत्कृष्ट ग्रंथालय चळवळ पुरस्कार’ विजय डोळ यांना प्रदान करण्यात आला. या वेळी तालुक्यातील सर्वच पत्रकारांचा पारनेर महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
Breaking News: Reading books makes a person humble and prosperous





























